पाळधी / धरणगाव,दि.१४(धर्मसाथी मीडिया नेटवर्क) : ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत धरणगाव तालुक्यातील झुरखेडे मंडळातील विठ्ठल मंदिर परिसरात शनिवारी सकाळी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी संवेदनशीलतेने व तातडीने सोडवाव्यात,असे आवाहन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना छोट्या-मोठ्या कामांसाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे या शिबिरातून तसेच पुढेही प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी व ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांना दिल्या.
या शिबिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले एकूण ७६५ दाखले वितरित करण्यात आले. त्यामध्ये जात प्रमाणपत्र १०२, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ८९ व उत्पन्न प्रमाणपत्र १२४ यांचा समावेश आहे.सुलभ शेतकरी योजना अंतर्गत तालुक्यातील १५८१ गटांमधील तसेच झुरखेडे मंडळातील २६४ गटांमधील 7/12 उताऱ्या वरील ‘तुकडा’शेरा कमी करून दुरुस्ती करण्यात आली व शेतकऱ्यांना दुरुस्त उतारे देण्यात आले. तसेच तगाई कर्ज, आयकट बोजे व बंडींग बोजे अशा कालबाह्य नोंदी कमी करून डिजिटल 7/12 व 8अ उतारे वितरित करण्यात आले. डिजिटल 7/12 उताऱ्यांच्या कायदेशीर वैधतेबाबतही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
‘जिवंत 7/12’ मोहिमेअंतर्गत तालुक्यातील ७५९ मयत खातेदारांच्या वारस नोंदी घेऊन त्यांची नावे 7/12 वर नोंदवून उतारे वितरित करण्यात आले. यामध्ये झुरखेडे मंडळातील १२५ प्रकरणांचा समावेश आहे. याशिवाय अकृषक तरतुदीतील सुधारणा, विकास आराखड्यानंतर अकृषक परवानगीची नवीन व्यवस्था तसेच एकदाच अधिमूल्य भरण्याच्या सोप्या पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात विविध विभागांच्या माध्यमातून अनेक सेवा देण्यात आल्या. त्यामध्ये नवीन रेशन कार्ड ३१, वारस फेरफार १२५, कालबाह्य नोंदी कमी ७४१, आयुष्मान भारत कार्ड १५, घरकुल लाभार्थी नमुना-८ – ३० अशा सेवांचा समावेश होता. पंचायत समिती धरणगावतर्फे रोहयो प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
कृषी विभागामार्फत कांदा चाळ पूर्वसंमती ५, पॅक हाऊस पूर्वसंमती १ व शेततळे पूर्वसंमती १ मंजूर करण्यात आले. भूमी अभिलेख विभागामार्फत ९ गावांतील एकूण २३०० ड्रोन सर्वे सनदांचे वितरण करण्यात आले. याशिवाय घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी यांसारख्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी केले, तर तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून या अभियानामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, संदीप मोरे, मंडळ अधिकारी हेमंत महाजन, ग्राम महसूल अधिकारी शांतीलाल नाईक, हर्षल थाटे, मोहन चौगले, जावेद देशमुख, गौरव बाविस्कर, गट विकास अधिकारी किशोर वानखेडे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई, दत्तात्रय वाघ, भूमी अभिलेख उपअधीक्षक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
झुरखेडा येथील लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील तसेच परिसरातील सरपंच छाया पाटील, विजय पाटील,वंदना शंकर पाटील,उत्तम देवचंद सोनवणे,मंजुळाबाई श्रीकांत चव्हाण,गुलाबकांत चव्हाण,सुरेश पाटील,गुलाबराव सोनवणे,धिरज पाटील,मिलिंद पाटील,कैलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच परिसरातील पोलीस पाटील प्रल्हाद चौधरी, छाया नवल अहिरे,दिलीप सावळे,वर्षा अनिल बोरसे,मुकुंद निकम,भिका पाटील,सुनिल धनगर,पुरुषोत्तम पाचपोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी,लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
