जळगाव :दि.२६ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) सामाजिक न्याय,शिक्षण आणि सर्वसमावेशक विकासाचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्पण सेवा ट्रस्ट व पवन ट्रस्ट, जळगाव यांच्या वतीने इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सुमारे ₹२०,००० किमतीची शालेय पुस्तके मोफत वाटप करण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील युवक व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा होता.पुस्तकांचे वाटप करताना विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास,कठोर परिश्रम आणि समाजाप्रती कर्तव्यभावना जपण्याचा संदेश संस्थेचे अध्यक्ष डॉ.विलास नारखेडे यांच्याकडून देण्यात आला.
यावेळी पदाधिकारी रघुनाथ राणे,पवन नारखेडे,यांनी सांगितले की,राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले होते. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पवन चॅरिटेबल ट्रस्ट भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, मार्गदर्शन आणि विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत राहील.
या उपक्रमामुळे लाभार्थी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी रुपेश ठाकूर कामराज तडवी,लक्ष्मी सोनवणे इत्यादींनी अर्पण सेवा ट्रस्टचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
