भुसावळ – दि.३ (धर्मसाथी मीडिया नेटवर्क) मुंबईतील नंदवन येथे आज भुसावळच्या राजकारणाला नवे वळण देणारी राजकीय घडामोड घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल संतोषभाऊ चौधरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशामुळे भुसावळच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भुसावळ व जळगावच्या विकासासाठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणे, हा या राजकीय निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे.
या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोरआप्पा पाटील,चोपडा आमदार चंद्रकांतअण्णा सोनवणे,मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील,पारोळा आमदार अमोल पाटील,उपनेत्या सरिता माळी कोल्हे तसेच जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे अनिल चौधरी आणि नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वाला नवी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या तिघांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी काळात भुसावळच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे आकार घेतात, याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
