.
जळगाव – दि.९ (धर्मसाथी मिडिया नेटवर्क)किडनी हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग असून किडनी सुदृढ असेल तर शरीराच्या सर्व प्रक्रिया सुरक्षित कार्य करतात. त्यामुळे किडनीच्या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत असा सल्ला किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभय जोशी यांनी दिला.
आंतरराष्ट्रीय महिला दिन व जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि नेफ्रॉन किडनी व डायलिसीस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने “किडनीची काळजी घेऊया-आरोग्य चांगले ठेऊया” या विषयावर डॉ.अभय जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले व उपस्थित सर्वांची विनामुल्य ब्लड प्रेशर व शुगर तपासणी करण्यात आली.
सध्या भारतात क्रॉनिक किडनी आजाराचे जवळजवळ दहा कोटी रुग्ण आहेत.जगभरातील मृत्युच्या कारणांमध्ये किडनीच्या आजारामुळे मृत्यू होणे हे नववे प्रमुख कारण आहे. तरी देखील किडनीच्या सुरक्षिततेबाबत नागरिकां मध्ये आवश्यक जनजागृती नाही.किडनीचे कार्य हे शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे असून दिवसभरात १८० लिटर रक्त शुद्धीकरणाची क्षमता किडन्यांमध्ये असते. किडनीच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास हातापायावर सूज येणे,मळमळ होणे,लघवी वेळेवर न होणे किंवा वारंवार लागणे,अँनिमिया,हाडांमध्ये ठिसूळपणा इत्यादी लक्षणे जाणवतात.परिणामी संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते. उच्च रक्तदाब आणि शुगर असणाऱ्या नागरिकांना किडनी आजार होण्याची शक्यता जास्त असते.
त्यामुळे नियमित व्यायाम,संतुलित आहार,वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे अत्यंत आवश्यक आहे,अशी महत्वपूर्ण माहिती डॉ.अभय जोशी यांनी दिली.सोबत किडनी प्रत्यारोपण प्रक्रियेबाबत ही सविस्तर माहिती दिली आणि उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले.याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन,चेअरमन डॉ.मंगला ठोंबरे,सेक्रेटरी सुभाष सांखला,डॉ.उषा शर्मा, वार्षिक सभासद डॉ. नितीन धांडे, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, डॉ. राजेश सुरळकर, रेडक्रॉस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले.
किडनी निरोगी तर संपूर्ण शरीर निरोगी..म्हणून वेळीच तपासण्या महत्वाच्या – किडनी विकार तज्ज्ञ डॉ. अभय जोशी.
RELATED ARTICLES
